महाराष्ट्रात थंडीला सुरुवात ; माणिकराव खुळे म्हणतात या जिल्ह्यात…..
राज्यात थंडीला सुरुवात झाली असून, शनिवार, दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी जळगाव जिल्ह्याने महाराष्ट्रातील पहिल्या थंडीच्या लाटेसदृश्य स्थितीचा अनुभव घेतला. निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, थंडीचा हा जोर आता वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
शनिवारी जळगाव येथे १०.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा तब्बल पाच अंशांनी खाली घसरले आहे. इतकेच नव्हे, तर जळगावचे कमाल तापमानही (३०.८ अंश से.) सरासरीच्या तुलनेत २.७ अंशांनी खाली नोंदवले गेल्याने, दिवसभर हवेत गारवा जाणवत होता.
आजपासून (रविवार, ९ नोव्हेंबर) थंडीचा हा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. पुढील आठवडाभर, म्हणजेच शनिवार, दि. १५ नोव्हेंबरपर्यंत, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि उत्तर अहिल्या नगर या सहा जिल्ह्यांत किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंशांनी घसरणार आहे. तसेच, विदर्भातही तापमान सरासरीपेक्षा २ अंशांनी खाली राहून चांगल्या थंडीची शक्यता जाणवत आहे.